शेतकऱ्यांनो, मोटर सुरू करण्यापूर्वी विद्युत सुरक्षेची काळजी घ्या; मगच स्टार्टरला हात लावा
लातूर, दि. १९ ऑगस्ट : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहीर किंवा बोअरवेलवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज विद्युत यंत्रणेशी संपर्क येतो. मात्र विद्युत यंत्रणेतील बिघाड, खराब वायरिंग, केबलचे कोटिंग निघणे किंवा ओलाव्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात हा धोका अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांनी मोटर सुरू करण्यापूर्वी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मोटर सुरू करण्यापूर्वी स्टार्टर, स्विच, वायरिंग, केबल आणि जोडण्या व्यवस्थित आहेत का, याची तपासणी करावी. उघडी किंवा कोटिंग निघालेली वायर आढळल्यास स्वतः दुरुस्ती न करता अधिकृत वायरमनकडून दुरुस्ती करून घ्यावी.
शेतकऱ्यांसाठी विद्युत सुरक्षेच्या महत्त्वाच्या सूचना
- अर्थिंग व्यवस्थित करून घ्यावी आणि वेळोवेळी तिची तपासणी करावी.
- मोटर सुरू करण्यापूर्वी स्टार्टर, स्विच, वायरिंग, केबल व जोडण्या तपासाव्यात.
- ओल्या हाताने किंवा अनवाणी पायाने मोटर, स्टार्टर अथवा स्विचला हात लावू नये.
- पावसाळ्यात स्टार्टरची पेटी, स्विच किंवा परिसर ओला असल्यास मोटर सुरू करू नये.
- उघडी किंवा खराब झालेली वायर दिसल्यास स्वतः दुरुस्ती करू नये.
- मोटरसाठी योग्य क्षमतेचा RCCB/ELCB बसवून घ्यावा.
- विद्युत पेटी पाणी व पावसापासून सुरक्षित ठेवावी.
- फ्यूज, MCB किंवा अन्य सुरक्षा उपकरणे वारंवार ट्रिप होत असल्यास कारण शोधल्याशिवाय वीजपुरवठा पुन्हा सुरू करू नये.
- स्टार्टरच्या लोखंडी पेटीला किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करण्यापूर्वी परिसर पूर्णपणे कोरडा असल्याची खात्री करावी.
पावसाळ्यात विशेष काळजी घ्या : ओलावा आणि खराब वायरिंगमुळे विजेचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ओले हात नाही, अनवाणी पाय नाही आणि उघड्या वायरला हात नाही, हा सुरक्षिततेचा नियम नेहमी लक्षात ठेवा.
महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनेलला फॉलो करा.





No comments: