कंधार (प्रतिनिधी) : विस्तार अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक तसेच मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना, तालुका शाखा कंधारच्या वतीने प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. दि. २७ ऑगस्टपासून पंचायत समिती कंधार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संघटनेने यापूर्वी दि. ४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कंधार यांना लेखी निवेदन देऊन या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले होते. मात्र, वारंवार कळवूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेचे प्रमुख मागण्यांमध्ये विस्तार अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करणे, तसेच ग्रामपंचायत तपासणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे**, या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच सेवानिवृत्त होऊन ८ ते १० महिने उलटूनही सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत तपासणीच्या नावाखाली पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि आंदोलन किती दिवस सुरू राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
संघटनेने आपल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद नांदेड तसेच जिल्हाध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांच्याकडेही दिल्या आहेत.




No comments: