नांदेड (प्रतिनिधी) : मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने घोषणा करून प्रत्यक्षात कामे अर्धवट ठेवणाऱ्या सरकारविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचा जाब सरकारला विचारला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली, तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संयोजनाने हे आंदोलन होणार आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांचा हिशेब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे मागितला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नांदेडच्या गोदावरी रिव्हरफ्रंट, १८ निजामकालीन पोलीस ठाण्यांचे कायापालट, नांदेड-वाघाळा मलनि:सारण व घनकचरा-बायोगॅस प्रकल्प, मराठवाडा मुक्तिसंग्राम माहिती संग्रहालय, लोहा पाणीपुरवठा योजना, बाभळी मध्यम प्रकल्प, उणेकेश्वर उच्च पातळी बंधारा, शासकीय कृषी महाविद्यालय, लेंडीत सिंचन प्रकल्प, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नांदेड विमानतळ विस्तार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विस्तार, माहूर पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास आराखडा आदी घोषणांचा सरकारला विसर पडल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, लोडशेडिंग, वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा प्रश्न यावरही आंदोलनातून आवाज उठविला जाणार आहे. जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दासखेडा पुलाची चौकशी, मेंढला प्रकल्प, कृष्णूर हेलिकॉप्टर प्रकल्प, शेतकरी आत्महत्या आणि हक्काच्या पाण्याचा प्रश्न सरकारसमोर मांडला जाणार आहे.
‘तुमसे ना हो पायेगा’चा नांदेडमधील आवाज सरकारच्या कानावर घालणारच, असा निर्धार शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, युवासेना विभागीय सचिव महेश खेडकर, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम, महानगरप्रमुख मनोज यादव, पुरुषोत्तम धोंडे, धोंडू पाटील, जिल्हा प्रवक्ता डॉ. बालाजी पेनुरकर, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सुनपे, विजय कल्याणकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.




No comments: