आठ वर्षांत सात प्रमुख भरती परीक्षा वादात; पेपरफुटी, गुणफेरफार आणि गैरव्यवहारामुळे भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
नागपूर | प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियांमध्ये २०१८ ते २०२६ या आठ वर्षांच्या कालावधीत सात प्रमुख परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पेपरफुटी, गुणांमध्ये फेरफार, प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वी बाहेर येणे आणि इतर गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. या घटनांमुळे लाखो उमेदवारांचा भरती प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
२०१८ ते २०२६ मधील प्रमुख वादग्रस्त परीक्षा
२०१८ – महाराष्ट्र टीईटी: तपासादरम्यान गुणांमध्ये फेरफार आणि गैरव्यवहार उघडकीस आल्याने मोठा वाद निर्माण झाला.
२०२० – महाराष्ट्र टीईटी: ओएमआर शीटमध्ये फेरफार करून उमेदवारांचे गुण वाढवल्याचा आरोप झाला. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
२०२१ – आरोग्य विभाग गट-क भरती: परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा आरोप झाल्याने भरती प्रक्रिया वादात सापडली.
२०२१ – आरोग्य विभाग गट-ड भरती: कथित पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२१ – महाडा भरती परीक्षा: पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली आणि संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी लागली.
२०२६ – महाराष्ट्र टीईटी: परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा संशय आल्याने परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणी चौकशी सुरू असून लाखो उमेदवार प्रतीक्षेत आहेत.
२०२६ – एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा: पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर चौकशीची मागणी झाली असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भरती प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. उमेदवारांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे. सरकारनेही भविष्यात राज्यातील परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीसह विविध उपाययोजनांचा विचार सुरू केला आहे.




No comments: