नांदेड, दि. २४ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन आदेशात नमूद केलेली कृत्ये करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि सक्षम अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुकांना वगळण्यात आले आहे.
पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या सभा, मिरवणुका, मोर्चे तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांना राहणार आहेत.
नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




No comments: